शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
आज, सहा डिसेंबर २०२४, सकाळी आम्ही आमची आन्हिके आटोपली, मैयाची पूजा केली आणि आमचे गाठोडे घेऊन बाहेर पडलो. थंडी चांगलीच होती, थोडे धुकेही होते, पण थोडे चालल्यावर अंगात उब आली. आज आम्ही शालिवाहनपर्यंत जाणार होतो आणि बहुतांश रस्ता मैयाच्या किनाऱ्याने होता. नदीकिनारील खाचखळगे नसलेली वाट मिळाली, तर तो 'अवघा आनंदच' असतो, आणि आजची वाट तशीच होती. त्यामुळे आम्ही मजेत चाललो होतो.
वाटेत एक-दोन ठिकाणी चहाचा प्रसाद मिळाला. अकरा-साडेअकराच्या सुमारास आम्ही बडगाव येथील मांडव्य ऋषींच्या गुंफ़ेजवळ पोहोचलो. गुंफ़ेच्या आधी असलेल्या एका हॉलमध्ये खूप गर्दी होती, काही वाहनेही होती. चौकशी केली असता, 'विवेकजी' नावाचे साधू त्यांच्या भक्तमंडळींसोबत परिक्रमा करत असून, त्यांची यात्रा लवकरच इथे पोहोचणार होती. त्यांच्या भोजनाची आणि इतर व्यवस्थेची लगबग चालू होती. एकूणच ते दादागुरूंसारखेच मोठे साधू असावेत.
महंतांचे दर्शन आणि भोजनप्रसादी
तेवढ्यात आश्रमाचे महंत मैयाकडून आले. मैयाला नैवेद्य दाखवायला गेले असावेत. ते तरुण होते. आम्हाला पाहताच प्रसन्न हसत 'नर्मदे हर' म्हणाले. पाच मिनिटांतच सेवेकऱ्याने 'भोजन की सिताराम' अशी हाक दिली. आम्ही भोजनप्रसादी घेण्यासाठी गेलो. वाढताना महंत म्हणाले, "आज आश्रमात हा सेवेकरी आणि मी असे दोघेच आहोत. बाकी कोणी नाही. त्यामुळे आम्ही जे भोजन तयार केले आहे, त्यात काही कमी-जास्ती असेल, तर सांभाळून घ्या."
आता याला काय म्हणावे? आमच्यासारख्या अनोळखी लोकांना जेवण द्यावे आणि वर कसलेही कारण नसताना क्षमायाचनाही करावी? खरे संत नेहमीच विनयशील असतात. हे महंत त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. भोजनोत्तर थोडा सत्संग झाला आणि त्यांनी आम्हाला परिक्रमेबाबत काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. सायंकाळच्या सुमारास शालिवाहन येथे पोहोचलो. पलिकडच्या तिरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी महेश्वर आहे, तिथला घाट फ़ार सुंदर दिसत होता. तिथे जेव्हा पोहोचू तेव्हा तो नीट पाहता येईल. आता शालिवाहन येथे आहोत. ज्या ठिकाणाहून शालिवाहन शक सुरू झाले, ते हेच ठिकाण. येथे हजारो वर्षांपूर्वीचे शिवलिंग आहे. दिवंगत खासदार अनिल माधव दवे यांच्या प्रयत्नातून तेथे उभारण्यात आलेली एक धर्मशाळा आहे. त्याला लागूनच आश्रमही आहे. आम्ही त्या धर्मशाळेत आसने लावली. मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आश्रमात येऊन मैयाची सायंपूजा केली.
शालिवाहन येथील रात्र आणि नवा दिवस
सात-साडेसातच्या सुमारास 'भोजन की सिताराम' झाली. भोजन करून आम्ही आमच्या आसनावर येऊन बसलो. आश्रमात चांगलीच गर्दी होती. मी माझ्याकडे असलेले काही अतिरिक्त सामान या आश्रमात कमी केले.
रात्री आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या महाराजांना मंदिर सकाळी किती वाजता उघडेल असे विचारले. त्यावर ते म्हणाले, "मंदिर कधीच बंद होत नाही, चोवीस तास उघडे असते." सकाळी रुद्रपाठ करण्यासाठी त्यांची परवानगी घेतली, त्यांनीही ती मोठ्या खुशीने दिली. अंथरुणावर येऊन आडवा झालो आणि झोप कधी लागली ते कळलेही नाही.
हा भाग कसा वाटला, ते जरूर कळवा.
Marathi literature, spiritual journey, Narmada Parikrama, travelogue, personal narrative, divine connection, faith
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineGuidance #FaithAndDestiny #Pilgrimage #MandavyaRishi #Shalivahan #DevotionalStory





